NEW ARRIVALS

New book titles available in the shop

Checkout Now!

new books banner

आयएम अरुण वैद्य (१९४९-२०२५) यांच्या स्मृतींना उजाळा - एक कसलेले बुद्धिबळपटू आणि थोर प्रशिक्षक

by Vivek Sohani - 15/02/2026

२४ डिसेंबर २०२५ रोजी भारतीय बुद्धिबळ विश्वातील एक तारा निखळला! वैद्य सर म्हणून बुद्धिबळ जगतात ओळखले जाणारे अरुण वैद्य भारताचे सातवे आंतरराष्ट्रीय मास्तर होते. ग्रीस येथे झालेल्या १९८४ सालच्या फिडे ऑलिम्पियाड स्पर्धेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. “आपण जे मिळवतो त्यातून आपला उदरनिर्वाह होतो; पण आपण जे देतो त्यातून आपले जीवन घडते.” विस्टन चर्चिलचं हे वाक्य वैद्य सरांना तंतोतंत लागू होतं! ते स्वतः तर उत्कृष्ठ खेळाडू होतेच पण बुद्धिबळ क्षेत्रातील अनेक नामांकित खेळाडूंच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. आज ह्या सदरात आपण त्यांच्याविषयी अधिक जाणून घेऊ तसेच त्यांच्याविषयी विश्वनाथन आनंद, प्रवीण ठिपसे यांच्यासारख्या खेळाडूंचे गौरवद्गार देखील बघू.



१९४९ साली जन्मलेले अरुण वैद्य १९७०-८० च्या दशकात भारतातील हाताच्या बोटावर मोजता येतील अश्या तगड्या खेळाडूंमध्ये गणले जात होते. भारताचे सातवे आंतरराष्ट्रीय मास्तर होण्याचा मान त्यांनी १९८५ साली दुबई येथे झालेल्या एशिअन झोनल स्पर्धेत मिळवला होता. १९८४ सालच्या फिडे ऑलिम्पियाड स्पर्धेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. २४ डिसेंबर २०२५ रोजी त्यांचे मुंबई येथे दुखःद निधन झाले आणि भारतीय बुद्धिबळ विश्वातील एक हरहुन्नरी तारा निखळला. अरुण वैद्य यांच्याबद्दलची सर्वात प्रेरणादायी गोष्ट म्हणजे त्यांचे खेळावर असलेले नितांत प्रेम. निधनाच्या काही दिवस आधीही त्यांनी आपल्या घरी मुलांसाठी बुद्धिबळ प्रशिक्षण वर्ग घेतले होते.

बुद्धिबळाच्या खेळावर निस्सीम प्रेमाचे मूर्तिमंत प्रतीक – अरुण वैद्य (आंतरराष्ट्रीय मास्टर).

अरुण वैद्य १९७१ साली शिमला येथे झालेल्या 'नॅशनल बी' स्पर्धेत विजेते झाले आणि त्यांनी ह्याच विजयाची पुनरावृत्ती १९८२ साली गुजरात येथील स्पर्धेत केली. १९७१ ची 'नॅशनल बी' जिंकल्यावर पुढे शिमला येथे झलेल्या देशातील सर्वोच्च स्पर्धा मानल्या जाणाऱ्या ‘नॅशनल ए’ स्पर्धेत त्यांनी अत्यंत दिमाखदार कामगिरी करीत १३ पैकी ९.५ गुण मिळवत मॅन्युएल आरोन व मोहम्मद हसन यांच्यासोबत संयुक्त अव्वल स्थान पटकावले. अरुण वैद्य यांनी मॅन्युएल आरोन यांच्यावर सुंदर डावपेचांनी सजलेला एक अप्रतिम विजय मिळवला होता. त्या डावाबद्दल बोलताना ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे म्हणतात,

"वैद्य यांनी भारतीय बुद्धिबळातील एक तत्कालीन गूढ समजल्या जाणाऱ्या आणि जवळपास अपराजित मानल्या जाणाऱ्या खेळाडूवर शानदार विजय मिळवला. तो खरोखरच एक महान डाव होता!"

- प्रवीण ठिपसे (ग्रँडमास्टर व वैद्य यांचे समकालीन खेळाडू)

मॅन्युएल आरोन वि. अरुण वैद्य, नॅशनल ए १९७२

काळ्या मोहऱ्यांचाल आणि विजय - शोधा पाहू!

या स्थितीत वैद्य सरळ ...Re8 अशी चाल खेळूनही पुढे खेळ सुरू ठेवू शकले असते. पण e4 वरील प्यादे कमकुवत होते आणि त्यांची स्थिती स्पष्टपणे अधिक चांगली होती. ह्या परीस्थित शांतपणे खेळतील तर ते वैद्य सर कसले! त्यांनी थेट आक्रमण करून प्रतिस्पर्ध्याला चारी मुंड्या चीत करण्याचा मार्ग निवडला! ...Nxe4!! — एक थक्क करणारा बळी (Sacrifice)! Bxe4 Bh4!
Bf2 आणि आपण या रंजक स्थितीत पोहोचतो…

काळ्याची चाल — आणि निर्णायक घाव शोधा!

या स्थितीत काळ्याने ...Re8!! ही अप्रतिम चाल खेळली. हा ‘पिन’ इतकी निर्णायक आहे की पांढऱ्याकडे स्वतःला वाचवण्याचा कोणताही मार्ग उरत नाही.

त्या वर्षाच्या शेवटी दिल्ली येथे अव्वल तीन स्थानांसाठी प्ले-ऑफ सामना आयोजित करण्यात आला. मॅन्युएल आरोन यांनी या स्पर्धेत वर्चस्व गाजवत पहिले स्थान मिळवले, तर मोहम्मद हसन दुसऱ्या स्थानावर राहिले. अरुण वैद्य यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

१९७३ च्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेतील कामगिरीनंतर वैद्य यांनी सक्रिय खेळातून काही काळ विश्रांती घेतली आणि वैयक्तिक आयुष्यावर लक्ष केंद्रित केले. १९८० च्या दशकात त्यांनी पुन्हा व्यावसायिक बुद्धिबळ क्षेत्रात पुनरागमन केले आणि नव्या जोमाने पटावर आपली विलक्षण क्षमता दाखवण्यास सुरुवात केली. १९८२ साली त्यांनी पलनी येथील स्पर्धा जिंकली. Indian Chess History या पुस्तकात एक गमतीशीर गोष्ट नमूद आहे: “कलायमपुथूर येथील विजयकुमार मिल्सचे अध्यक्ष जी. वेंकटरामन दरवर्षी बक्षीस रक्कम तसेच प्रवेश शुल्क २५% ने वाढवत असत. स्पर्धा बंद होईपर्यंत ती देशातील बहुदा सर्वात श्रीमंत खुली स्पर्धा बनली होती. मिल्समध्ये सूत (कापसाचा दोरा) तयार होत असल्यामुळे स्पर्धा सभागृहात एक वेगळीच सूचना लावलेली होती — ‘धूम्रपान फक्त स्पर्धा सभागृहाच्या आतच परवानगी आहे!’”

१९८२ साली पालनी येथील स्पर्धेत सुंदर चषकासह अरुण वैद्य

१९८० च्या दशकाच्या मध्यात तरुण विश्वनाथन आनंद झपाट्याने पुढे येत होता. त्याने १९८४ पासून राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धांमध्ये खेळण्यास सुरुवात केली आणि १९८६ साली आपले पहिले राष्ट्रीय (ओपन) विजेतेपद पटकावले.

‘मद्रास टायगर’ म्हणून ओळखले जाणारा विशी आनंद, ज्याने पुढे अनेक मोठे विजय मिळवले, त्यांने १९८० च्या दशकाच्या मध्यात राष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपल्या विजयमोहीमेची मुहूर्तमेढ रोवली होती. | छायाचित्र: व्ही. कामेश्वरन

१९८६ सालची बॉम्बे राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा शेवटच्या फेरीत विश्वनाथन आनंद आणि अरुण वैद्य आमनेसामने असल्याने सरांच्या विशेष स्मरणात होती. त्या वेळी आनंद ११ गुणांवर होता तर अरुण वैद्य १०.५ गुणांवर होते. जर वैद्य सरांनी तो सामना जिंकला असता, तर ते राष्ट्रीय विजेते होण्याची दाट शक्यता होती — त्यांच्या कारकिर्दीत न मिळालेला हा किताब त्यांना मिळू शकला असता. सामन्याची सुरुवात ग्रुनफेल्ड डिफेन्स मधून झाली आणि जवळपास ८०% चालींपर्यंत वैद्य यांनी डावावर वर्चस्व गाजवले. परंतु त्यांना त्या आघाडीचे रूपांतर विजयात करता आले नाही. १६ वर्षांचा विशी आनंद प्रतिस्पर्ध्याच्या काही चुका मिळताच संधीचा अचूक फायदा घेत असे आणि इथेही तसेच काहीसे घडले आणि त्याने त्या डावात विजय मिळवला.

१९८६ च्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेतील विश्वनाथन आनंद आणि अरुण वैद्य यांच्यातील हा निर्णायक सामना ठरला. या डावामुळे अवघ्या १६ व्या वर्षी विश्वनाथन आनंद आपल्या आयुष्यात प्रथमच राष्ट्रीय विजेते ठरले!

“हा डाव चुकाांनी भरलेला होता, पण तरीही तो खूपच रंजक होता. शेवटी आम्ही दोघांनी एकत्र फोटोसाठी पोझ दिली. बाहेरून पाहता वैद्य फक्त माझा शेवटच्या फेरीतील प्रतिस्पर्धी वाटू शकतात, पण प्रत्यक्षात तेदेखील विजेतेपदासाठी लढत होते. जर त्यांनी मला हरवले असते, तर किताब त्यांच्याकडे गेला असता! त्यांचे टाय-ब्रेक गुणही अत्यंत मजबूत झाले असते. त्या उत्साहात तेही गुंतले आणि शेवटी त्यांचा वेळ संपल्यामुळे ते पराभूत झाला.”

- विश्वनाथन आनंद (ग्रँडमास्टर व ५ वेळा झालेला विश्वविजेता)

१९८६ साली झालेल्या २३व्या नॅशनल ‘ए’ अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम गुणतालिका.

हीच अरुण वैद्य यांनी खेळलेली शेवटची राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा ठरली. १९९० च्या दशकात ते पुण्यात स्थायिक झाले आणि त्यांनी बुद्धिबळ प्रशिक्षणाची कारकीर्द सुरू केली. प्रशिक्षण देणे हा अरुण यांच्या आयुष्याच्या मूळ आराखड्यात कधीच नव्हता. त्यांच्या जिवलग मित्र रवी बेहेरे यांनी त्यांना सल्ला दिला — “तुझ्याकडे बुद्धिबळाचे इतके अफाट ज्ञान आहे, ते फक्त स्वतःपुरते का ठेवतोस? ते इतरांपर्यंत का पोहोचवत नाहीस?” हीच ती ट्रिगर मोमेंट होती, ज्यामुळे अरुण वैद्य यांनी बुद्धिबळाचे धडे देण्यास सुरुवात केली.

पुण्यातील अकादमीच्या उद्घाटन समारंभाचे काही क्षण

या फोटोमागची एक सुंदर कथा म्हणजे समोर दिसणाऱ्या बुद्धिबळ संचाची. २००० साली अभिजित कुंटे यांनी आपला पहिला ग्रँडमास्टर (GM) नॉर्म मिळवला, तेव्हा त्यांच्या प्रशिक्षकांनी (श्री. वैद्य यांनी) त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांना तो बुद्धिबळ संच भेट दिला.

“ती केवळ एक भेट नव्हती, तर माझ्यावर असलेल्या त्यांच्या विश्वासाचे आणि आपल्या शिष्याच्या प्रवासाबद्दलच्या त्यांच्या शांत अभिमानाचे प्रतीक होते.”

- अभिजित कुंटे (ग्रँडमास्टर, भारतीय वूमन टीमचा कोच)

अरुण वैद्य यांना हा बुद्धिबळाचा संच त्यांचे गुरु पी. जे. वैद्य यांनी दिला होता. पुढे २००० साली अरुण यांनी तो अभिजितला दिला, आणि अभिजितने तो पुढे विदित गुजराथी सुपर ग्रँडमास्टर झाल्यावर त्याला दिला. हा बुद्धिबळ संच म्हणजे गुरुच्या मनातील खऱ्या अभिमानाचे प्रतीक आहे—जेव्हा शिष्य आपल्या गुरुंच्या ताकदीपलीकडे जाऊन मोठी कामगिरी करतो, तेव्हा गुरुला होणारा आनंद आणि समाधान याचे हे सुंदर प्रतीक आहे.

आता उत्सुकता आहे… विदित हा संच पुढे कोणाला देईल? ♟️

लेखात पुढे त्यांच्या शिष्यांनी दिलेल्या श्रद्धांजलींमध्ये अनेक सुंदर आठवणी आणि किस्से सांगितले आहेत. त्यापैकी एक हृदयस्पर्शी गोष्ट आम्हाला अरुण वैद्य यांच्या पत्नी सुनीला यांनी सांगितली.

वैद्य सरांनी आपल्या अकॅडमीत विश्वनाथन आनंदचा एक फोटो लावला होताआणि त्याखाली त्यांनी लिहिले होते — “१५वा विश्व बुद्धिबळ विजेता.” ही गोष्ट ९०च्या दशकातील आहे — जेव्हा आनंद अजून विश्वविजेता झाला नव्हता. ही केवळ एक ओळ नव्हती, तर ती एका प्रशिक्षकाच्या दूरदृष्टीची आणि आपल्या विद्यार्थ्यांवर असलेल्या अथांग विश्वासाची साक्ष होती. 🌟♟️

जेव्हा आनंद फक्त १२ वर्षांचा होता, तेव्हाच अरुण वैद्य यांनी एका मराठी वर्तमानपत्रात त्याच्याबद्दल लिहिले होते की “हा मुलगा इतका तडफदार आहे की तुम्हाला विश्वास बसणार नाही. तो पुढे नक्कीच मोठं नाव कमावेल.” त्या वयातच त्याच्या खेळातील तीव्रता, वेग आणि आत्मविश्वास ओळखणारी ही दृष्टी खरोखरच विलक्षण होती. पुढे आनंदाने विश्वविजेतेपद पटकावून त्या शब्दांना अक्षरशः खरं ठरवलं. ♟️✨

वैद्य सरांचे विद्यार्थी त्यांना नेहमी विचारायचे — “आनंद अजून विश्वविजेता झालाच नाही, मग तुम्ही त्याला १५वा विश्वविजेता का लिहिलं?” तेव्हा अरुण सर हसत त्यांना आनंद बद्दलच्या अनेक गोष्टी, किस्से आणि त्याच्या खेळातील वैशिष्ट्ये सांगायचे. त्यांच्या शब्दांत केवळ प्रशंसा नव्हती, तर एक अढळ विश्वास होता. आणि मग २००० साली जेव्हा आनंद खरोखरच विश्वविजेता झाला, तेव्हा अरुण सरांना झालेला आनंद आणि अभिमान किती अफाट असेल याची आपण कल्पनाच करू शकतो! त्यांच्या दूरदृष्टीचा आणि विश्वासाचा तो सुवर्णक्षण होता — त्यांच्या भाकिताला अखेर यशाची मोहोर मिळाली होती.

२००० साली आनंदने शिरोव्ह्चा पराभव करून विश्वविजेतेपद पटकावले, तेव्हा अरुण वैद्य यांनी मराठी वर्तमानपत्रात एक भावपूर्ण लेख लिहिला होता.

वैद्य कुटुंबाशी असलेल्या सागर आणि अमृताच्या आठवणी -

वैद्य सरांच्या सुविनय पत्नी - सुनीला काकुंसोबत अमृता

दोहा येथे फिडे जलद आणि अतिजलद स्पर्धे दरम्यान आम्ही रात्रीच्या जेवणाच्या टेबलावर बसलो असताना अरुण वैद्य सरांच्या निधनाची बातमी समजली. क्षणभर सगळं स्तब्ध झालं. ही बातमी ऐकताच अमृताच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. वैद्य सरांचा प्रभाव केवळ तिच्या बुद्धिबळातील प्रगतीपुरता मर्यादित नव्हता; त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना तिच्या मनात खेळाविषयीची खरी ओढ आणि प्रेम अधिकच वाढले होते. “आपण वैद्य सरांना त्यांच्या शेवटच्या दिवसांत भेटू शकलो नाही,” ती हळूच म्हणाली, “पण आपण परत गेल्यावर नक्कीच काकूंना भेटायला जाऊ.” आणि आम्ही आमचं वचन पाळलं. ५ जानेवारी २०२६ रोजी आम्ही ठाण्याला गेलो — त्यांच्या आठवणींना, त्यांच्या प्रेमळ सहवासाला आणि त्या नात्याला पुन्हा एकदा स्पर्श करण्यासाठी.

ठाण्यात आम्ही गेलो तेव्हा काकूंनी (आंटी) अरुण वैद्य सरांच्या अनेक कामगिरी आम्हाला प्रेमाने दाखवल्या. प्रत्येक ट्रॉफी, प्रत्येक सन्मानामागे एक कथा होती — परिश्रमाची, जिद्दीची आणि खेळावरील निष्ठेची. त्यातला हा विशेष सन्मान म्हणजे शिवछत्रपती पुरस्कार — महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार.

त्या पुरस्काराचा जवळून काढलेला फोटो

अमृता वैद्य सरांच्या पुस्तकरूपी खजिना चाळताना...

वैद्य सरांची पुस्तके आता टेम्पल ऑफ चेस मध्ये सर्व बुद्धिबळ प्रेमींसाठी आता पाठवण्यात येतील.

आम्ही तिथे असताना अनेक पाहुणे घरी येत होते. तरीही काकूंनी खास वेळ काढून आम्हाला आठवणींच्या वाटेने पुन्हा एकदा फिरवून आणले. त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट जाणवत होते की त्यांनी अरुण सरांसोबत आणि बुद्धिबळासोबत एक परिपूर्ण आयुष्य जगले होते. त्यांना खेळाच्या बारकाव्यांची सखोल माहिती नसली, तरी पतीच्या बुद्धिबळावरील उत्कटतेची त्यांना पूर्ण जाणीव होती. खेळाडू म्हणून असो किंवा प्रशिक्षक म्हणून — प्रत्येक टप्प्यावर त्यांनी अरुण सरांना निःशब्द पण ठाम साथ दिली. कदाचित म्हणूनच त्यांच्या आसपास असताना बहुतेक विद्यार्थ्यांना आई-वडिलांसोबत असल्यासारखी ऊब आणि सुरक्षिततेची भावना यायची. अरुण आणि सुनीला यांना आपलं स्वतःचं अपत्य नव्हतं, पण त्यांच्यासाठी मनापासून “आई-बाबा” मानणारी असंख्य माणसं होती. हीच त्यांची खरी संपत्ती होती — नात्यांची, प्रेमाची आणि बुद्धिबळातून जोडलेल्या एका मोठ्या कुटुंबाची.

ठाण्यात असताना आम्ही अरुण वैद्य सरांच्या एका विद्यार्थ्याची आई — रूपल सागर — यांनाही भेटलो.

“त्यांना त्यांच्या मोटारसायकलची विलक्षण आवड होती,” रूपल म्हणाल्या. “आयुष्यभर करायची इच्छा असलेल्या गोष्टींपैकी ती एक होती. माझ्या मुलाचे प्रशिक्षक म्हणून सुरुवात झाली, पण हळूहळू ते माझ्यासाठीही वडिलांसारखे झाले. किराणा आणायला गेले की ते मला फोन करून विचारायचे — ‘घरासाठी काही हवं आहे का?’ अशी होती त्यांची ऊब आणि काळजी. ते कधीच पैशामागे धावणारे नव्हते; मुलांना प्रशिक्षण देण्यातच त्यांना खरा आनंद मिळायचा. आजच्या या बुद्धिबळातील व्यापारीकरणाच्या काळात त्यांच्यासोबत काम करणं खूपच मनाला समाधान देणारं होतं.” काही तास काकूंशी गप्पा मारून आम्ही घराबाहेर पडलो, तेव्हा मनात एकच भावना होती — किती सुंदर आयुष्य जगले वैद्य सर!

शेवटच्या श्वासापर्यंत सक्रिय — मोटारसायकलवर प्रवास करणारे, मुलांना बुद्धिबळ शिकवणारे, साधं अन्न आवडीने खाणारे आणि आयुष्यात अर्थपूर्ण नाती जपणारे. खरंच, एक परिपूर्ण आणि समाधानाचं आयुष्य! अमृतासाठी हा अनुभव म्हणजे तिच्या आयुष्यात बुद्धिबळाला रोमांचक बनवणाऱ्या व्यक्तीच्या आठवणींना पुन्हा एकदा स्पर्श करणं होतं. आणि माझ्यासाठी — अमृतामार्फत — एका चांगल्या प्रशिक्षकाचा विद्यार्थ्यावर किती खोल आणि दीर्घकाळ टिकणारा प्रभाव पडू शकतो, याची जाणीव पुन्हा एकदा प्रकर्षाने झाली.

वैद्य सरांचा जीवनपट खालील फोटोंच्या माध्यमातून -

अरुणजी आणि नायजेल शोर्ट (माजी विश्वविजेतेपद आव्हानवीर)

जेव्हा जेव्हा मी हा फोटो बघतो तेव्हा तेव्हा ...

... तालच्या ह्या फोटोची आठवण होते. वैद्य सर देखील तसेच खेळत असत!

वैद्य सरांच्या आयुष्यातील सुवर्णक्षण - १९८५ साली अटल बिहारी वाजपेयी यांनी आंतरराष्ट्रीय मास्टर किताब मिळाल्याबद्दल केलेला सत्कार

त्यांना अटळ बिहारी वाज्पेयींकडून हे पत्र देखील मिळाले होते!

वैद्य सर तत्कालीन राष्ट्रपती गीअनी झाली सिंग यांचेकडून मोमेंटो स्वीकारताना

अरुण वैद्य यांनी २५ जणांसोबत सायमल खेळले होते. पण विशेष बाब अशी होती की त्यातील तीन खेळाडू ह्या खाडिलकर भगिनी होत्या!

वैद्य सर खाडिलकर भारतीय महिला बुद्धिबळ इतिहासात दबदबा राखलेल्या खाडिलकर भगिनी यांचेसोबत !

ठाणे महानगरपालिकेकडून बुद्धीबळ क्षेत्रातील विशेष कामगिरीबद्दल आणि शहराचे नाव रोषन केल्यामुळे मिळालेला हा विशेष सन्मान!

अब्दुल जब्बार यांच्यासोबतच्या एका डावातील वैद्य सरांची स्कोअर शीट

एल पी खाडिलकर यांच्यासोबतच्या डावातील एक स्कोअर शीट

अरुण वैद्य सरांच्या निधनानंतर बुद्धिबळ विश्वातील अनेक मान्यवर व्यक्ती आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

अरुण वैद्य सरांना जवळून ओळखणाऱ्या भारतीय बुद्धिबळ क्षेत्रातील काही मान्यवर व्यक्तींशी आम्ही संपर्क साधला. त्यांच्यापैकी काही सरांचे समकालीन होते, तर काही त्यांच्या हाताखाली घडलेले विद्यार्थी.

विश्वनाथन आनंद:

विश्वनाथन आनंद १९८५ सालच्या कोलकाता स्पर्धेत अँडी सोल्टि आणि अरुण वैद्य यांच्यासोबत डावाचे विश्लेषण करताना.

मी नुकताच अरुण भास्कर वैद्य यांच्याबद्दल विचार करत होतो. ज्युनियर असताना काही स्पर्धांमध्ये मी कॅप घालायला सुरुवात केली, त्यामागचं कारणही तेच! त्यांच्या हातात एक किल्लीचा गुच्छ असायचा, तो ते एका बोटावर फिरवत असत. मला ते पाहिलं की थोडं विचलित व्हायचं, म्हणून मी कॅप घालायला लागलो. काही काळ आम्ही थोडे प्रतिस्पर्धीही होतो. पण त्याच वेळी आमच्यात आपुलकीही होती. आम्ही बरेच जण त्यांना “अंकल” म्हणायचो! माझा भाऊ त्या वेळी मुलुंडमध्ये राहत होता. मी जेव्हा मुलुंडला जायचो, तेव्हा तिथून लोकल ट्रेनने ठाण्याला जात असे. स्टेशनवर अरुण अंकल मला घ्यायला यायचे आणि मग आम्ही घरी जायचो. आजही पोह्यांची चव आणि कदाचित आंब्याच्या रसाची आठवण ताजी आहे — त्या वेळी मला दोन्ही फार आवडायचे. आम्ही बुद्धिबळावर चर्चा करायचो, कदाचित थोडं ब्लिट्झही खेळायचो. ते खूप प्रेमळ स्वभावाचे होते — ही आठवण विशेष आहे.

चेंबूरमध्ये मी त्यांना हरवल्यानंतरचा एक छान फोटो आहे. डाव चुकाांनी भरलेला होता, पण रोचक होता. शेवटी आम्ही एकत्र फोटो काढला. वरकरणी ते फक्त शेवटच्या फेरीतील प्रतिस्पर्धी वाटले असतील, पण प्रत्यक्षात तेही विजेतेपदासाठी लढत होते! त्यांनी तो डाव जिंकला असता, तर त्यांच्या टायब्रेक्स अतिशय जबरदस्त झाले असते आणि कदाचित किताबही त्यांच्या नावावर गेला असता. पण उत्साहात ते वेळेत अडकले आणि त्यांचा वेळ संपला. आमच्यात मैत्रीपूर्ण संबंध होते आणि त्यांच्या अनेक गोड आठवणी माझ्याकडे आहेत. मला असंही आठवतं की ते काही ऑलिम्पियाड्सला गेले होते — कदाचित मनीला, किंवा थेस्सालोनिकी किंवा नोवी साद (१९८८, १९९० किंवा १९९२ च्या सुमारास). नंतर मात्र आमचा संपर्क कमी झाला, ही खंत राहते. मागे अमृता किंवा प्रथमेश यांनी लिहिलेलं वाचलं — त्यांनी अनेक तरुणांना प्रशिक्षण दिलं, अनेकांच्या आयुष्यात बदल घडवला. त्या अर्थाने त्यांची उपस्थिती अजूनही जाणवते.

त्यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप वाईट वाटलं. पुन्हा एकदा त्यांना भेटता आलं असतं, तर किती छान झालं असतं…

बोरिस गेलफंड -

हा लेख प्रकाशित झाल्यानंतर जागतिक दर्जाचे ग्रँडमास्टर यांनी आम्हाला खालील शब्दांत संदेश पाठवला

“भारतीय संघ मिन्स्कला खेळण्यासाठी आला होता. मी दुसऱ्या पटावर मित्तेईविरुद्ध खेळलो. अरुण वैद्य तिसऱ्या पटावर कापेंगुटविरुद्ध खेळले. काळ्या मोहऱ्यांनी कापेंगुटने त्याची आवडती बेनोनी उघडणी खेळली, पण तो डाव माझ्याकडे नाही. पुढील दिवशी आम्ही डबल-राउंड ब्लिट्झ सामना खेळलो आणि माझी जोडी वैद्य यांच्याशी लागली. त्या डावांची नोंद आता उपलब्ध नाही. मी १२ पैकी १२ गुण मिळवले आणि त्यामुळे भारतीय पाहुण्यांवर छाप पडली. त्यांनी मिन्स्कमधील एका तरुण खेळाडूबद्दल गोष्ट सांगितली — आणि त्या वेळी प्रथमच विशीने माझ्याबद्दल ऐकले. माझ्या आयुष्यात प्रथमच मी परदेशी खेळाडूंविरुद्ध खेळत होतो, म्हणून हा सामना मला आजही जिवंतपणे आठवतो.”

अरुण वैद्य मिन्स्क येथे १९८५ साली बलाढ्य ग्रँडमास्टर अल्बर्ट कापेंगुट यांच्याविरुद्ध खेळताना.

तरुण बोरिस गेल्फंड त्याच सामन्यात ए. बी. मीतेई यांच्याविरुद्ध खेळताना | छायाचित्र: बोरिस गेल्फंड यांचा संग्रह

बोरिस गेल्फंड मागे दिसत आहेत, तर समोर अरुण वैद्य आणि अल्बर्ट कापेंगुट एकमेकांविरुद्ध खेळताना | छायाचित्र: बोरिस गेल्फंड यांचा संग्रह

याच संदर्भात बोरिस यांच्या पत्नी माया यांनी त्यांच्या फेसबुकवर एक रंजक किस्सा शेअर केला:

“१९८५ साली त्या काळातील भारतातील सर्वोत्तम बुद्धिबळपटूंचा एक प्रतिनिधीमंडळ सोव्हिएत संघात आला होता. या भेटीचं सोव्हिएत माध्यमांत मोठ्या प्रमाणावर वृत्तांकन झालं. प्रथम हे प्रतिनिधीमंडळ मॉस्कोला गेलं. त्यातील एका सदस्याने अत्यंत गंभीरपणे ‘सोव्हिएत बुद्धिबळ शाळा’ नेमकी कुठे आहे, हे विचारलं आणि ती ऐतिहासिक जागा दाखवण्याची मागणी केली. ‘सोव्हिएत बुद्धिबळ शाळा’ ही फक्त एक रूपकात्मक संज्ञा आहे, हे समजावण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले. शेवटी यजमानांनी समोर दिसलेल्या पहिल्याच इमारतीकडे बोट दाखवले — आणि भारतीय पाहुणे समाधानी झाले!”

अभिजित कुंटे -

Abhijit was Arun Vaidya's strongest student. He not only became a GM but also an amazing coach, guiding many young talents and also helping the Indian women's team win the Gold at the Chess Olympiad 2024!

“श्री अरुण वैद्य माझ्यासाठी फक्त प्रशिक्षक किंवा मार्गदर्शक नव्हते; ते माझ्या बुद्धिबळाच्या पायाभरणीचे खरे शिल्पकार होते.”

त्यांचे खेळावरचे प्रेम निर्मळ, तीव्र आणि बौद्धिक होते. आम्ही ज्या काळात शिकत होतो (१९९२ ते १९९५), त्या वेळी बुद्धिबळाची पुस्तके सहज उपलब्ध नव्हती आणि संगणक तर दूरची गोष्ट होती. तरीही त्यांनी आमचे विचारविश्व उंचावले—सखोल उद्घाटन तयारी, उच्च दर्जाची विचारपद्धती आणि गंभीर खेळाडू होण्यासाठी आवश्यक असलेली शिस्त शिकवली.

आजही मी त्यांच्या आवडीच्या ओपनिंग पैकी एक — सिसिलियन कान — खेळतो. पटावर त्यांची बुद्धिबळ तत्त्वज्ञान आजही जिवंत आहे. त्यांच्या घरी होणारे १२ ते १४ तास चालणारे मॅरेथॉन ब्लिट्झ सराव स्पर्धा हे माझ्या आयुष्यातील अमूल्य क्षण आहेत. त्या सत्रांनी केवळ माझे बुद्धिबळच नव्हे, तर माझा स्वभावही घडवला.

माझ्या पहिल्या ग्रँडमास्टर नॉर्मनंतर त्यांनी मला त्यांचा चांदीचा बुद्धिबळ पट भेट दिला—तो फक्त एक भेट नव्हता; तो त्यांच्या विश्वासाचा आणि विद्यार्थ्याच्या प्रगतीविषयीच्या शांत अभिमानाचा प्रतीक होता. त्यांच्या जाण्याने भारतीय बुद्धिबळविश्व आणि विशेषतः महाराष्ट्राने एक दूरदर्शी गुरु गमावला आहे.

मृणालिनी कुंटे -

भारतीय बुद्धिबळातील स्वर्णांकित भावंडं - अभिजित आणि मृणालिनी कुंटे

१९९०-९१ च्या सुमारास मी आणि अभिजित यांनी सरांकडे प्रशिक्षण सुरू केले. बाबांनी एका स्पर्धेत त्यांना भेटून आम्हाला प्रशिक्षण देण्याची विनंती केली आणि तिथून आमचा प्रवास सुरू झाला. सुरुवातीला आम्ही ठाण्यात त्यांच्या घरी जायचो. सर आणि काकू दोघेही विलक्षण शिक्षक होते. आम्ही सुमारे १५ दिवस त्यांच्या घरी राहायचो. संध्याकाळी फेरफटका, जवळच्या अभयारण्यात भेट—हे सगळं आजही आठवतं. काकूंच्या हातचे विविध पदार्थ म्हणजे वेगळीच मेजवानी! राहुल शेट्टी, चंद्रगुप्त आचार्य यांसारखे स्थानिक खेळाडूही तिथे येऊन सामने खेळायचे. नंतर ते पुण्यात स्थायिक झाले आणि अकॅडमी सुरू केली. सरांचे हे दालन आमच्या घराजवळ होते—सोयीचे आणि आपलेपणाचे वातावरण. आम्ही सगळे एक कुटुंबच होतो.

बुद्धिबळ प्रशिक्षणाच्या दृष्टीने त्यांनी आम्हाला सैद्धांतिक भक्कम पाया दिला. ओपनिंग तयारी कशी करावी, वेगवेगळ्या ओपनिंग लाईन्स लिहून ठेवणे, त्यावर आधारित सामने शोधणे, स्वतंत्र वही ठेवणे—ही सगळी शिस्त त्यांनीच शिकवली. पुढे Chessmate मासिकातील प्रिंटआउट्स वापरायला सांगितले. प्रत्येक ओपनिंगसोबत त्यामागील रणनीती समजून घेण्यावर त्यांचा भर असे.

ते नेहमीच खेळाडूंविषयीच्या अनुभवकथा सांगत. रवी शेखर, रवी कुमार, परमेश्वरन यांच्याशी असलेल्या मैत्रीच्या आठवणी आणि विश्वनाथन आनंद व अलेक्सी सुयेतिन यांच्या कॅम्पबद्दलच्या कथा आम्ही आवडीने ऐकत असू. १९९२ आणि १९९४ साली ऑलिम्पियाड संघात निवड झाल्यावर आणि राष्ट्रीय विजेतेपद मिळाल्यावर सर अत्यंत आनंदी होते. प्रत्येक प्रतिस्पर्ध्याचा अभ्यास, त्यांची शैली, प्रशिक्षक—सगळ्याचा सखोल अभ्यास करून त्यांनी मला तयार केले. १९९३ च्या वर्ल्ड ज्युनियर स्पर्धेत सुरुवात खराब झाली होती, तेव्हा सर कालीकटपर्यंत प्रवास करून मला साथ द्यायला आले—त्यांची उपस्थितीच प्रेरणादायी होती.

एक अत्यंत हृदयस्पर्शी प्रसंग म्हणजे सरांनी अभिजितला एक सुंदर बुद्धिबळ संच भेट देताना म्हटले, “तू माझ्यापेक्षा मोठा खेळाडू झालास. तुझा विद्यार्थी तुझ्यापेक्षा मोठा झाला, की हा संच त्याला दे.” पुढे अभिजितने तो संच विदित गुजराथी याला दिला. ही परंपरा म्हणजे एका गुरूच्या अभिमानाची, विश्वासाची आणि निरपेक्ष प्रेमाची जिवंत परंपरा आहे.

मी सरांप्रती कृतज्ञतेने नतमस्तक आहे!

प्रवीण ठिपसे -

एकेकाळी बुद्धिबळ स्पर्धांमध्ये धूम्रपान करण्यास परवानगी होती! अरुण वैद्य (डावीकडे) प्रवीण ठीपसेंशी खेळताना.

मी (किंवा आम्ही तिघे भाऊ) प्रथमच अरुण वैद्य यांना १९७३ साली पाहिले. १९७२ मधील World Chess Championship 1972 — फिशर–स्पास्की सामन्याच्या ऐतिहासिक लाटेत आम्ही स्पर्धात्मक बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली. १९७१ मधील आमच्या पहिल्याच स्पर्धेत अविनाश आवटे, एन. नीलकांतन आणि भालचंद्र विद्याधर गोखले यांसारख्या अनुभवी खेळाडूंशी ओळख झाली. त्यांनी आम्हाला देशातील बुद्धिबळ संघटनांची रचना — AICF, MSCA, BCA — तसेच प्रभादेवी येथील झांडू क्लब याबद्दल माहिती दिली.

१९७२ पासून आम्ही झंडू क्लबला अधूनमधून जाऊ लागलो. तेथे रोज स्नेहसामन्यांसाठी येणारे भारतीय बुद्धिबळातील दिग्गज — रामचंद्र सप्रे आणि श्रीकृष्ण साखळकर — यांना प्रत्यक्ष पाहून आम्ही थक्क झालो. वर्तमानपत्रांत वाचलेली नावे आमच्या डोळ्यांसमोर जिवंत होती! तेथेच आम्हाला सुरेश शालिग्राम, अरुण वैद्य, विजय अधिकारी, अब्दुल जब्बार आणि इतर अग्रगण्य खेळाडूंच्या कामगिरीबद्दल ऐकायला मिळाले. शालिग्राम आणि वैद्य हे ठाण्यात राहत असल्याने ते केवळ इंटरक्लब स्पर्धांच्या वेळी किंवा एखाद्या मोठ्या स्पर्धेनंतर क्लबला येत. त्यामुळे १९७३ पर्यंत आमचा त्यांच्याशी फारसा संपर्क नव्हता. दरम्यान, AICF चे संस्थापक सदस्य आणि टाइम्स ऑफ इंडिया मधील ‘रामजीज कॉर्नर’ या स्तंभाचे लेखक रमण मेनन (रामजी) हे झंडू क्लबचे रोजचे पाहुणे होते. ते जणू चालते-बोलते बुद्धिबळ विश्वकोशच होते.

१९७३ हे वर्ष अरुण वैद्य यांच्यासाठी सुवर्णक्षण ठरले. अहमदाबाद राष्ट्रीय ‘A’ स्पर्धेत त्यांनी मन्युएल आरोन आणि मोहम्मद हसन यांच्यासह प्रथम क्रमांक सामायिक केला. त्या वर्षीची टायब्रेक पद्धत वेगळी होती — अव्वल स्थानी असलेल्या सर्वांनी पुढील तारखेला चार फेऱ्यांचा राऊंड-रॉबिन सामना खेळायचा होता. मुंबईतील खेळाडू त्यांच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत होते — आणि ते लगेचच झंडू क्लबमध्ये हजर झाले. तेव्हाच मी प्रथमच वैद्यांना पाहिले. क्लबमध्ये जणू उत्सवाचे वातावरण होते. त्यांनी एका दिग्गज, जवळपास अजिंक्य समजल्या जाणाऱ्या खेळाडूवर मिळवलेला सिसिलियन (काळ्या मोहऱ्यांनी) विजय सर्वांना दाखवला. त्या डावाचे विश्लेषण अनेक दिवस चालले. राष्ट्रीय ‘A’ मधील अनेक सामने सखोल तपशिलांसह उलगडले गेले.

आवटे आणि नीलकांतन यांच्याशी आमची मैत्री झाली होती, त्यामुळे आम्ही निरागस प्रश्न विचारले तरी कुणीही टाळले नाही. झंडू संस्कृतीत अहंकाराला स्थान नव्हते. लवकरच ऐतिहासिक ‘इंटरक्लब’ स्पर्धा सुरू झाली. आम्ही प्राथमिक गटात खेळत होतो; पण प्रीमियर गटातील दिग्गजांना जवळून पाहण्याची संधी मिळाली. माझा स्वभाव लाजाळू असल्याने थेट संवाद कमी झाला, तरी रामचंद्र सप्रे, श्रीकृष्ण साखळकर, अरुण वैद्य, सुरेश शालिग्राम, शम्सुल हसन, मोहन बाबूर आणि रवी दांडेकर यांच्या खेळाचे निरीक्षण करण्याचे भाग्य लाभले. प्रत्येक जण आपल्या पद्धतीने एक दंतकथेप्रमाणे होता — आणि त्या सुवर्णकाळाचे साक्षीदार होणे हे आमच्यासाठी आयुष्यभराची शिदोरी ठरले.

"अरुण वैद्य यांच्या फोटो संग्रहातून सापडलेली ऐतिहासिक छायाचित्र – त्या काळातील दोन तरुण भारतीय बुद्धिबळपटू, आंतरराष्ट्रीय मंचावर आपली ओळख निर्माण करण्याआधी – IM वी. रवीकुमार आणि GM प्रविण ठिपसे."

दुर्दैवाने, १९७३ मधील टॉप स्थानासाठीचा प्ले-ऑफ अरुण वैद्यसाठी चांगला गेला नाही. तेव्हा ते इमारत प्रकल्पावर ठेकेदार म्हणून काम करत होते आणि कामगारांच्या गैरहजेरीमुळे निर्माण झालेल्या तणावाशी सामना करणे त्यांच्यासाठी कठीण झाले. तरीही, प्ले-ऑफमधील नकारात्मक निकाल असूनही, त्यांनी झंडूला भेट देणे सुरू ठेवले. अभय यांना भारतीय जिमखाना ऑल इंडिया ओपन शतरंज स्पर्धेत त्यांच्याशी सामना करण्याची संधीही मिळाली. १९७४ मध्ये, व्यावसायिक जबाबदाऱ्या असल्यामुळे वैद्य अचानक स्पर्धांमध्ये खेळणे थांबवले.

त्या काळात, एलो रेटिंग फक्त आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळूनच मिळवता येत असे, त्यामुळे १९६०-७० च्या दशकातील बऱ्याच भारतीय टॉप खेळाडूंना त्यांच्या उत्तम खेळ कौशल्यांनंतरही रेटिंग मिळालेले नव्हते. १९७८ च्या आसपास, FIDE ने रेटिंग नियम बदलले, ज्यामुळे राष्ट्रीय फेडरेशनना परदेशी सहभागी नसतानाही रेटिंग स्पर्धा आयोजित करता येऊ लागल्या. त्यामुळे नवीन पिढीला रेटिंग मिळवणे तुलनेने सोपे झाले.

१९८० मध्ये, वैद्यांनी व्यवसायात स्थिरता मिळाल्यानंतर शतरंजमध्ये परतण्याचा निर्णय घेतला. मात्र, इन्फॉर्मेटर पिढीने त्यांना गांभीर्याने घेतले नाही; त्यांचा विश्वास होता की शतरंज खेळात फक्त सिद्धांतज्ञानावरच निकाल अवलंबून असतो. तरीही, ‘अनरेटेड’ वैद्यांनी १९८० च्या सुरुवातीस ओपन स्पर्धा सलग जिंकल्या. त्यांनी फक्त नॅशनल बी, अहमदाबादमधून नॅशनल A मध्ये पात्रता मिळवली नाही, तर दीर्घ ११ वर्षांच्या अंतरानंतर दुसऱ्यांदा भारतीय संघात (फेब्रुवारी १९८४, अहमदाबाद) स्थान मिळवले. दशकभर आधी झंडू येथे मिळवलेले ज्ञान खूप उपयुक्त ठरले.

तथापि, युरोपियन स्पर्धांमध्ये आशियाई खेळाडूंसाठी चांगले प्रदर्शन करणे तेव्हा सोपे नव्हते. १९८१-१९८५ या काळात, AICF ने भारतीय संघांसाठी नियमित ग्रँडमास्टर कोचिंग कॅम्प्स आयोजित करण्यास सुरुवात केली आणि हे भारतीय संघासाठी खूप उपयुक्त ठरले. संघातील सर्वात वरिष्ठ खेळाडू असूनही (आपण सर्वांनी त्यांना ‘अंकल’ म्हटले), वैद्य ग्रँडमास्टर एडुआर्ड गुफेल्ड यांच्या कोचिंग कॅम्पमध्ये सर्वात प्रामाणिक विद्यार्थी दिसले. त्यांनी वर्गानंतर दररोज गुफेल्डच्या खोलीत जाऊन त्यांच्या ओपनिंग्ज आणि खेळांवर चर्चा केली. १९८४-८६ दरम्यान वैद्य एक जबरदस्त खेळाडू बनले. त्यांनी १९८४ च्या थेस्सालोनिकी ऑलिंपियाडमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. वैद्य यांना IM टायटल Asian Zonal Chess Championship, दुबई, जानेवारी 1985 मध्ये मिळाले.

अरुण वैद्य एडवर्ड गुफेल्ड सोबत - एकेकाळी एक अव्वल जीएम आणि प्रशिक्षक

काय फोटो आहे! महान महिला विश्वविजेत्या - माया चिबुरदानिड्झे सोबत!

१९८५ ते १९८९ दरम्यान, त्यांना AICF ने अनेक प्रशिक्षण शिबिरांमध्ये प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले. या अनुभवाने त्यांच्या प्रशिक्षण कौशल्याचा पाया रचला. वैद्य १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला ठाणेहून पुण्याला गेले आणि त्यांनी स्पर्धांमध्ये सहभाग कमी केला. त्यांनी तरुणांना प्रशिक्षण देण्यावर लक्ष केंद्रित केले आणि त्यात ते खूप यशस्वी झाले.

वैद्य हे बहु-कुशल व्यक्तिमत्व होते. त्यांना स्वयंपाकाची आवड होती आणि ते एक उत्कृष्ट स्वयंपाकी होते. ते एक मजबूत व्यक्तिमत्व होते जे त्यांनी ज्या निर्णयांवर टिकून राहिले ते घेत असत. बांधकाम कंत्राटदार म्हणून काम करताना, त्यांनी मध्यमवर्गीयांना माहित नसलेली अनेक कौशल्ये शिकली होती. वैद्य यांच्याकडे चावीशिवाय बहुतेक कुलूपे उघडण्याची किंवा योग्य उपकरणांशिवाय मॅन्युअल बुद्धिबळ घड्याळे दुरुस्त करण्याची असामान्य कौशल्य होती. त्यांनी नेहमीच त्यांच्या कल्पना आणि कृतींद्वारे त्यांची उपस्थिती जाणवून दिली.

मला आठवत नाही की मी त्यांना शेवटचे कधी भेटलो होतो पण आम्ही एकत्र खेळलेली शेवटची स्पर्धा १९९८ मध्ये गुड्रिक होती. त्यांनी अपेक्षेइतकी चांगली कामगिरी केली नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्यांची कामगिरी इतकी चांगली नसली तरी, ज्ञान मिळवण्याची त्यांची इच्छा आणि रस किंचितही कमी झाला नव्हता. किरिल जॉर्जिएव्हने किंग्ज इंडियन डिफेन्सविरुद्ध पराभव पत्करल्यानंतर, ते माझ्या खोलीत खेळाचे विश्लेषण करण्यासाठी आले. ते निघण्यापूर्वी आम्ही २-३ तास ​​विश्लेषण केले. बुद्धिबळ खेळाडू म्हणून हा आमचा शेवटचा प्रत्यक्ष संवाद होता.

वैद्य यांची तब्येत चांगली नसली तरी, त्यांच्या ७६ व्या वाढदिवसाच्या काही दिवस आधी त्यांचे अनपेक्षित निधन भारतीय बुद्धिबळ जगतासाठी धक्कादायक होते.

राकेश कुलकर्णी -

डावीकडून दुसरा - आंतरराष्ट्रीय मास्टर राकेश कुलकर्णी

वैद्य सरांना मी डिसेंबर २००४ मध्ये रोचेस दरम्यान ठाणे येथे भेटलो, ते पुण्याहून स्थलांतरित झाल्यानंतर काही आठवड्यांनीच. २००५ च्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आमचा पहिला बुद्धिबळाचा धडा होता आणि त्यानंतर कधीच थांबलो नाही! सर माझ्या बालपणात १० वर्षांहून अधिक काळ माझे मुख्य मूलभूत प्रशिक्षक होते! त्यांनी मला फक्त बुद्धिबळच नाही तर जीवनाचेही शिक्षण दिले! त्यांनी जीवन कौशल्ये शिकण्यावर आणि केवळ बुद्धिबळाच्या ज्ञानाने परिपूर्ण राहण्यावर भर दिला. माझ्या नवजात कारकिर्दीत, सरांनी मला त्यांच्या मागील कामगिरीबद्दल व्यावसायिक बुद्धिबळ खेळण्यास प्रेरित केले ज्यामध्ये अनेक स्पर्धा पदके, सरकारी पुरस्कार आणि अनेक वर्षे भारतीय संघात राहणे यांचा समावेश होता! हायलाइट - किशोरवयीन विशी आनंदसोबत १९८६ च्या दुबई बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये खेळणे!

आम्ही अनेकदा त्यांचे पुण्यातील माजी विद्यार्थी जसे की जीएम अभिजित कुंटे, डब्ल्यूजीएम सौम्या स्वामिनाथन, स्वाती घाटे, ईशा करावडे इत्यादींना भेटलो. आणि इतर अनेक! सर नेहमीच त्यांच्या आवडत्या आयएम प्रथमेश मोकलचा उल्लेख करत असत, जो नेहमीच अतिशय शिस्तप्रिय, मेहनती आणि अत्यंत तंदुरुस्त होता (कराटे ब्लॅक बेल्ट!)

सरांसोबतची सर्वात प्रेमळ आठवण २००९ ची होती, माझ्या दहावीच्या बोर्ड परीक्षेनंतर, जेव्हा माझे कुटुंब आणि मी सुट्टीसाठी जाण्याचा विचार करत होतो, परंतु त्यांनी आम्हाला स्पेनमधील आगामी एक महिन्याच्या एक्सपोजर ट्रिपवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला आणि पटवून दिले, जे मी २००८ मध्ये नॅशनल सब-ज्युनियरमध्ये टॉप-५ मध्ये स्थान मिळवल्यामुळे मिळवले होते. माझे कुटुंब सुट्टीसाठी पुढे गेले, तर मी दोन आठवड्यांसाठी सरांच्या घरी शिफ्ट झालो!

सर आणि काकू यांनी बुद्धिबळ वर्गांव्यतिरिक्त माझे आमच्या आयुष्यात स्वागत केले. २४x७ बुद्धिबळाचे ज्ञान, बुद्धिबळाच्या कथा, एकूण धडे, सराव खेळ आणि कवायती होत्या आणि भरपूर चहा (जो सरांना खूप आवडायचा!) काकू नेहमीच आम्हाला अद्भुत नाश्ता आणि चविष्ट जेवण आणत असे! बोर्डवर काही समृद्ध वेड्या विश्लेषणामुळे कधीकधी ते थंड व्हायचे! त्या १५ दिवसांत, सरांनी मला त्यांचा स्वयंपाकही दाखवला! सरांची चिकन करी चविष्ट होती!

सर आणि काकू दोघांनीही मला वारंवार स्पर्धा जीवनाबद्दल धडे शिकवले ज्यामध्ये प्रवास बुक करणे, स्वतःचे जेवण बनवणे, गोंधळ न करता शक्य ते खाणे, स्वावलंबी असणे आणि माझ्या स्वतःच्या सहलींसाठी पैसे देणे समाविष्ट होते! महामारीनंतर, मला वाईट वाटते की आम्ही ते वारंवार केले नाही. पण, २९ डिसेंबर रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना भेटायला जाण्याची प्रथा होती! (दुर्दैवाने, यावेळी संधी मिळाली नाही). जरी काही महिन्यांपूर्वीपर्यंत ते अजूनही प्रशिक्षण देत असले तरी, मला वाटते की मी त्यांचा आंतरराष्ट्रीय मास्टर बनणारा शेवटचा विद्यार्थी होतो!

यामुळे मला शिवछत्रपती पुरस्कार (महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च क्रीडा सन्मान) देखील मिळाला. ही एक अशी कामगिरी आहे ज्याचा सरांना खूप अभिमान होता! सर आणि काकूशिवाय हे शक्य झाले नसते! शेवटी, सर आणि काकू आमच्या लग्नाच्या सोहळ्याला उपस्थित राहिले हे खरोखर छान होते! मला माझ्या पत्नी देवला खरोखर दाखवायचे होते की ज्याच्याशी तिने लग्न केले आहे तो अरुण वैद्य आणि काकू नसते तर अर्धाही चांगला नसता!

स्वाती घाटे -

अरुण वैद्य, वैद्य काकू आणि माझा सहवास १९९५ मध्ये मी दहावीची बोर्ड परीक्षा संपवून पुण्याला गेलो तेव्हापासून सुरू झाला. मी जुन्या काळातील गुरुकुल पद्धतीत वैद्य सरांसोबत राहत होते. मी माझे मूळ गाव सांगली येथून माध्यमिक शिक्षण पूर्ण करत असतानाही बहुतेक वेळ वैद्य सरांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यात जात असे.

बुद्धिबळ वर्तुळात 'काका' म्हणून ओळखले जाणारे अरुण वैद्य हे मुळात ठाण्याचे होते परंतु तरुण पिढीला बुद्धिबळ शिकवण्याच्या एकमेव उद्देशाने १९९३ मध्ये पुण्यात आले होते. पुणे आणि मुंबईतील अनेक नामांकित खेळाडू जे पुढे व्यावसायिक बुद्धिबळपटू बनले त्यांना वैद्य सरांकडून असंख्य टिप्स आणि मार्गदर्शन मिळाले होते. त्या दोघांनीही मला मुलीसारखे वागवले. त्यांना स्वतःचे मूल नव्हते पण वैद्य काकूंच्या प्रेमाने, बारीकसारीक गोष्टींमधील काळजीने आम्हा सर्वांना दुसरे घर दिले.

मला आठवतंय की वैद्य सरांच्या घरी अनेक ज्येष्ठ खेळाडू एकत्र जमायचे आणि आम्ही जवळजवळ संपूर्ण रात्र ब्लिट्झ गेम खेळायचो. अर्थातच वैद्य काकू स्वादिष्ट जेवण देऊन त्यांची भूक पूर्णपणे सांभाळत असत. सरांनी आम्हाला केवळ बुद्धिबळ शिकवले नाही तर दुचाकी दुरुस्त करणे, स्वयंपाकाच्या टिप्स यासारखे दैनंदिन जीवनाचे बरेच ज्ञान दिले. ते मनाने एक उद्यमशील व्यक्ती होते कारण त्यांच्या जीवन प्रवासात बरेच चढ-उतार होते. त्यांनी माझगाव डॉकमध्ये काम केले होते, इलेक्ट्रिकल दुकान होते, थोडे राजकीय जीवन होते आणि काही काळासाठी ते यूएईमधील एका अकादमीसाठी बुद्धिबळ प्रशिक्षक देखील होते.

मुंबईतील बुद्धिबळपटूंना अजूनही ते दिवस आठवतात जेव्हा वैद्य सरांसह सर्व ज्येष्ठ खेळाडू झंडू कॅन्टीनमध्ये एकत्र येत असत आणि दिवसभर एकत्र बुद्धिबळ खेळांवर चर्चा करत असत. त्यांच्या ट्रेडमार्क कान आणि पॉलसेन ओपनिंगने वैद्य सर त्यांच्या शिखरावर असलेल्या अनेक दुर्बल खेळाडूंना हरवले. ते केवळ बुद्धिबळ क्षेत्रातच नव्हे तर त्यांच्या मदत करणाऱ्या आणि उत्साही स्वभावामुळे ज्या समाजात ते राहत होते त्या समाजातही लोकप्रिय होते.

ईशा करवडे -

सिसिलियन शिकवणे आणि सिसिलियनचा खरा अनुभव घेणे हे मला वैद्य सरांनी शिकवले. त्यांच्याकडून मी आणखी एक गोष्ट शिकलो ती म्हणजे रुक लिफ्ट्स! ते म्हणायचे की रुक हलके असतात! मला आठवते की मी रुक लिफ्ट मूव्ह Rd4 वापरून एक गेम खेळले होते! या मूव्हमुळे मी खूप आनंदी होते. मला आता हा गेम सापडत नाहीये हे वाईट आहे.

अरुण वैद्य यांच्या संग्रहातील तरुणी ईशा करवडेचा एक फोटो.

केतकी कुलकर्णी -

मला आठवतंय की सरांकडे एक जुनी डायरी होती - त्यांनी काही मजेदार कॅप्शनसह इकडे तिकडे लिहिलेल्या स्वतःच्या सर्वोत्तम खेळांचा संग्रह. त्यात एक डाव होता जिथे सरांनी फक्त १६ चालींमध्ये मुंबईच्या एका प्रसिद्ध खेळाडूला चेकमेट केले होते. या खेळाचे शीर्षक होते "चंपी" गेम!

त्यांच्या बुद्धिबळ सिद्धांताने मला आणि त्याच्या अनेक विद्यार्थ्यांना चांगले निकाल मिळविण्यात मदत केली. सुरुवातीच्या काही चालींमध्ये गोंधळ घालण्याऐवजी, त्यांनी आम्हाला तार्किक विचार करायला शिकवले. एंडगेम मध्ये, जर ते एखाद्या विद्यार्थ्याचा राजा सुरक्षितपणे बसलेला पाहत असत, तर ते म्हणायचे की 'राजा आता शेवटच्या खेळात राजा नाही. तो एक तुकडा बनतो. म्हणून तो बाहेर काढा!'

सर एक उत्तम कथाकार होते! ते आम्हाला ६४ चौरसांच्या पलीकडे अनेक मनोरंजक गोष्टी सांगायचे. काही अत्यंत मजेदार होत्या आणि काही खरोखरच प्रेरणादायी होत्या. एकदा, त्यांनी आम्हाला जवळजवळ पटवून दिले की कास्पारोव्ह हा खरोखरच भारतातील तामिळनाडूचा कासु-अप्पा-राव आहे! आम्ही निश्चितच भोळे होतो - पण त्यामुळे त्यांच्या अद्भुत कथाकथन क्षमतेत घट होत नाही!

प्रथमेश मोकल -

प्रथमेशचा अभिजित कुंटे सोबतचा फोटो

या ख्रिसमसमध्ये आमच्या सांताचे निधन झाले आहे. १९८० च्या दशकात भारतातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक असलेले माझे माजी प्रशिक्षक आंतरराष्ट्रीय मास्टर अरुण वैद्य यांच्या निधनाबद्दल आम्हाला खूप दुःख आहे. अरुण वैद्य सर (बुद्धिबळ वर्तुळात लोकप्रिय असलेले काका) १९९० च्या दशकात काही वर्षांसाठी पुण्यात स्थलांतरित झाले होते आणि सांताप्रमाणेच ते दुर्मिळ बुद्धिबळ ज्ञान आणि शहाणपणाचे धडे घेऊन आले होते, ज्याची आम्हाला नितांत आवश्यकता होती. त्यांनी आणि त्यांच्या पत्नी सुनीला वैद्य यांनी आम्हाला इतके प्रेम, काळजी आणि सामान्य ज्ञान दिले की आम्ही डोळे मिटून त्यांच्या काही चुका स्वीकारल्या. त्यांच्याबद्दल मनापासून कृतज्ञता.

पुणे आणि महाराष्ट्रातील अनेक आणि अगदी भारतातील काही विजेते खेळाडूंनी त्याच्याकडून खूप काही शिकले आहे, फक्त काहींची नावे सांगायची झाली तर, अभिजित कुंटे, मृणालिनी कुंटे, स्वाती घाटे, ईशा करवडे, सौम्या स्वामिनाथन, राकेश कुलकर्णी, मी, माझी बहीण अमृता मोकल आणि यादी पुढे जाते... शेवटी मला नेहमीच इच्छा होती, पण पुढे ढकलली गेली आणि त्यांच्या शेवटच्या काळात त्यांच्यासोबत जास्त वेळ घालवू शकलो नाही याची खंत मी बाळगेन. फक्त असा विचार करत होतो की ते इथेच आहेत आणि मी लवकरच त्यांना भेटायला जाईन. अचानक झालेल्या निधनाने खूप दुःख झाले. सरांच्या आत्म्याला सद्गती लाभो. ओम शांती!

अमृता मोकल

वैद्य सरांचा माझ्या आयुष्यावर अनेक प्रकारे खूप मोठा प्रभाव पडला. एक किस्सा सांगायचा तर, माझ्या १२ वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धेच्या (U-12 Nationals) अवघे काही दिवस आधीच मी सरांकडे क्लास लावला होता. सरांनी मला 'सिसिलियन कान' (Sicilian Kan) ओपनिंगच्या फक्त पहिल्या चार चाली आणि त्यातील काही महत्त्वाच्या युक्त्या अशा प्रकारे शिकवल्या की, अवघ्या काही दिवसांत जेव्हा मी नॅशनल्सला गेले, तेव्हा मी तानियाविरुद्ध (तानिया सचदेव) एक अत्यंत महत्त्वाचा डाव जिंकू शकले. ज्या वेळी आमचा सामना झाला, तेव्हा ती ७ पैकी ७ गुण मिळवून स्पर्धेत आघाडीवर होती.

जेव्हा मी स्पर्धेवरून परतले, तेव्हा सरांना तो डाव इतका आवडला की, त्या काळी त्यांच्या घरी येणाऱ्या त्यांच्या कोणत्याही बुद्धिबळ खेळणाऱ्या मित्राला ते मला तो डाव दाखवायला सांगत असत. मला त्या 'कान' ओपनिंगचं इतकं प्रेम जडलं की मी आयुष्यभर तेच ओपनिंग खेळले. त्यांच्याकडे खूप छान पुस्तकांचा संग्रह होता आणि कोटोव्हचं "Think like a Grandmaster" सारख्या पुस्तकांचा आनंद घेण्याच्या माझ्या खूप चांगल्या आठवणी आहेत, जिथे एकाच डावाचे विश्लेषण तासनतास आणि खूप खोलात जाऊन केले जायचे.

त्यांनी शिक्षण नेहमीच परवडण्याजोगे ठेवले. पैशांचा विचार न करणाऱ्या अशा प्रशिक्षकाकडून शिकताना एक मोठा फरक पडतो, कारण प्रशिक्षकाला इतर कशाहीपेक्षा खेळावर जास्त प्रेम आहे, हा पूर्ण विश्वास तिथे असतो. मला त्यांची आणखी एक गोष्ट खूप आवडायची ती म्हणजे त्यांची 'गोष्ट सांगण्याची पद्धत', जी प्रत्येक चालीमध्ये असायची. ते प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध मानसशास्त्र कसे वापरायचे आणि गोष्टी सांगत स्वतःचे डाव कसे उलगडून दाखवायचे, हे शिकणे अद्भुत होते.

त्यांचं घर बुद्धिबळासाठी कोणालाही, केव्हाही उघडे असायचे. तुम्ही घरात शिरलात की लिव्हिंग रूममध्ये फक्त बुद्धिबळाच्या सरावासाठी खास बनवलेले टेबल-खुर्च्या आणि पुस्तकांचे कपाट दिसायचे. काकू नेहमीच खंबीर आधार बनून पाठीशी होत्या आणि उन्हाळ्यात त्यांच्या हातचं घरगुती आईस्क्रीम आणि पेप्सीकोला सर्व विद्यार्थ्यांना किती आवडायचं, याच्या माझ्याकडे गोड आठवणी आहेत. त्यामुळे सर आणि काकू दोघांनीही एका प्रकारे बुद्धिबळासाठी आपलं सर्वस्व दिलं.

खूप दुःखद गोष्ट म्हणजे आम्हाला त्यांच्या या दैदिप्यमान आयुष्याची सविस्तर मुलाखत घ्यायची होती. GCL दरम्यान मला त्यांना ओळखणारी एक व्यक्ती भेटली होती आणि आमचं बोलणंही झालं होतं की जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये आपण काही करू, पण दुर्दैवाने ते होऊ शकलं नाही. तरीही, त्यांनी मला दिलेले ज्ञान मी नक्कीच पुढे लोकांपर्यंत पोहोचवेन.

ऑनलाईन मिळालेल्या काही श्रद्धांजली:

  • "माझी त्यांची भेट पलानी येथील स्पर्धांमध्ये झाली होती. त्यांनी आनंद-कास्पारोव्ह डावाचे सार्वजनिक विश्लेषण केले होते, जे लोकांच्या खूप पसंतीस उतरले होते. ओम शांती." - जयदीप उणुदुर्ती

  • "१९९८ मध्ये माझ्या इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षात असताना मी पुण्यात ज्या कॉम्प्लेक्समध्ये राहायचो, तिथेच अरुण काका राहायचे. स्वाती घाटे त्यांच्याकडे प्रशिक्षण घ्यायची. आम्ही कधीच बुद्धिबळावर बोललो नाही, पण अत्यंत आनंदी स्वभाव, चेहऱ्यावर जिंकल्याचे स्मितहास्य आणि उत्तम वागणूक असलेल्या त्यांच्याबद्दल माझ्या मनात खूप छान आठवणी आहेत." - बिटकॉइनर टेक्सास

  • "श्री. अरुण वैद्य आता आपल्यात नाहीत हे जाणून खूप वाईट वाटले. ते तामिळनाडूमध्येही एक प्रसिद्ध इंटरनॅशनल मास्टर (IM) म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो." - मित्र कांत पूर्ण शर्मा

  • "१९८४ मध्ये कीव येथे मी अरुण वैद्य यांच्याशी खेळलो होतो. त्यांच्या कुटुंबाबद्दल आणि भारतीय बुद्धिबळपटूंप्रती मी तीव्र संवेदना व्यक्त करतो." - दिमित्री कोमारोव्ह

  • "त्यांच्यासोबत वेळ घालवताना खूप मजा यायची. सुदैवाने गेल्या ३ वर्षांपासून त्यांच्या शेवटच्या दिवसापर्यंत मी त्यांच्या संपर्कात होतो. ते खेळाबद्दल अत्यंत उत्कट होते. ते भारतीय बुद्धिबळाचे 'विकिपीडिया' होते. अरुण वैद्य सर, तुमची खूप आठवण येईल." - आशिष थत्ते

  • "अरुण वैद्य यांचा वारसा त्यांनी घडवलेल्या आणि प्रेरित केलेल्या असंख्य विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जिवंत राहील. भारतीय बुद्धिबळावरचा त्यांचा प्रभाव कधीही विसरता येणार नाही." - ह्युगो व्हिलानुएव्हा

  • "अरे बापरे, ते एक अद्भुत आणि आक्रमक खेळाडू होते. मुंबईत झंडू फार्मा कँटीनमधून चालणाऱ्या BCA मध्ये मला त्यांना भेटण्याची संधी मिळाली होती. मला वाटते की मी त्यांच्यासोबत एक-दोन डाव खेळलो असावे." - राममोहन काळे

  • "प्रभू आदरणीय अरुण वैद्य सरांच्या आत्म्यास शांती देवो. एक उत्तम माणूस. जीएम स्वप्नील धोपाडे लहान असताना मी त्याला कोचिंगसाठी आदरणीय अरुण वैद्य सरांकडे नेले होते. महान प्रशिक्षक." - ओम काक्रा

  • "ते आमचे शेजारी होते, जेव्हा ते ठाण्यात राहत होते. त्यांनी माझ्या मोठ्या मुलाला शिकवले. आम्हाला त्यांची नेहमीच आठवण येत असे." - श्रेया बागवे

  • "जीएम प्रवीण थिपसे आणि ७० च्या व ८० च्या दशकाच्या उत्तरार्धात फिलीपिन्स स्पर्धांमध्ये खेळणारे टी.एन. परमेश्वरन व रविशेखर यांसारख्या काही कमी प्रसिद्ध भारतीय मास्टर्ससोबत, भारतीय बुद्धिबळाच्या पुनरुत्थानातील ते एक प्रणेते होते." - साल्डी क्युडियामॅट लोपेझ

  • "१९८० च्या दशकात भिलवाडा चेससारख्या दिल्लीतील स्पर्धांमध्ये त्यांना खेळताना पाहण्याचे भाग्य मला लाभले. ते खूप मृदूभाषी होते, अत्यंत प्रतिष्ठेने आणि सहजतेने ते हॉलमध्ये प्रवेश करायचे. ते हाडाचे लढवय्ये होते. अशा महान खेळाडूचे निधन झाल्याचे कळल्यावर खूप दुःख झाले. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. ओम शांती." - गिरीधरन गिरीचेस

  • "भावपूर्ण श्रद्धांजली... मी आयएम अरुण वैद्य यांच्यासोबत काही डाव खेळलो आणि नेहमी हरलो. पण त्यांच्याकडून अनेक डावपेच शिकलो. पुढे त्यांच्यामुळेच मला बक्षिसे मिळाली. मी त्यांचा सदैव ऋणी राहीन. त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकून खूप वाईट वाटले." - सी.व्ही.के. बालकृष्णन

"एक अद्भुत बुद्धिबळपटू, एक प्रेमळ प्रशिक्षक आणि एक खरा बुद्धिबळ प्रेमी - अरुण वैद्य (१९४९-२०२५)"




Contact Us